Sunday, October 10, 2010

दमलेल्या बाबाची कहाणी - खंत की कांगावा

संदीप खरे लिखित आणि सलिल कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेले ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ हे गीत सध्या खूपच गाजते आहे. गीतामधला बाबा बर्‍याच जणांना आपले प्रातिनिधीक स्वरूप असल्याचा भास होतो आणि मग गाणे अजुनच हॄदय पिळवटून टाकते. गाण्यामधल्या बाबामधे जर तुम्ही खरच स्वत:ला पहात असाल तर तुम्हाला दोन प्रश्न स्वत:ला विचारलेच पाहीजेत. माझ्या कुटुंबापेक्षा माझे करीअर जास्त महत्वाचे आहे का? मी कुटुंबाबरोबर वेळ कसा व्यतित करतो? ह्या प्रश्नांच्या उत्तरामधून तुम्हाला हे उलगडेल की गाण्यामधली परिस्थीती कशी निर्माण झाली, ती अपरिहार्य होती की स्वनिर्मित. नाहीतर ही एका दमलेल्या बाबाची कहाणी न उरता एका स्वकेंद्रीत ‘करीअर’वादी बाबाचा कांगावा ठरेल.

अनेक जण असे म्हणतील की आम्ही ह्या सर्व खस्ता कुटुंबासाठीच खात असतो ना? नक्कीच, आपण सर्व आपल्या कुटुंबीयांच्या सुखासाठी झटत असतो. पण इतर भौतीक सुखांबरोबर कुटुंबीयांची एक भावनीक गरज पण असते जी केवळ आपले त्यांच्याबरोबरचे अस्तित्वच पूर्ण करु शकते. शाळेत बक्षिस समारंभाला उपस्थीत असलेल्या बाबाच्या डोळ्यातील कौतुकाची बरोबरी फोनवरच्या शुभेच्छा किंवा ग्रीटींगशी कशी करता येईल? केवळ प्रचंड पैसा, गाड्या, टी व्ही, मोबाईल कुटुंबाला उपलब्ध करुन देणे म्हणजे त्यांना सुख देणे होत नाही. ह्या सर्व सुखसुविधांचा त्यांच्या बरोबरीने उपभोग घेणेही तितकेच महत्वाचे आहे. ही गोष्ट आपण विसरता कामा नये की कुटुंबसुख हे आपले साध्य आहे आणि करीअर हे साधन. पण सध्या सगळ्याच बाबतीत साध्यापेक्षा साधनाला जास्त महत्व आले आहे.

दुसरा प्रश्न मी कुटुंबीयांबरोबर वेळ कसा व्यतित करतो? तुम्ही कुटुंबाबरोबर किती वेळ व्यतित करता हे इथे विचारलेले नाही. किती पेक्षा कसा वेळ व्यतित होतो हे जास्त महत्वाचे. वेळ कोणालाच पुरत नाही, ज्यांचा वेळ पुरुन उरतो त्यांचे आयुष्य संपत आलेले असते. म्हणूनच जो वेळ आपल्याला मोकळा मिळाला आहे त्याचा आपण कसा उपयोग करतो ते बघावे. गाण्यातल्या बाबाला सुद्धा कधी ना कधी सुट्टी मिळतच असेल की ? सुट्टी नाही तर हक्काची रजा तरी तो घेऊ शकत असेल. मग अशा सुट्टीच्या दिवशी बाबा काय करतो हे फार महत्वाचे आहे. नेहमीच ऑफीसमधे मर मर मरावे लागते म्हणून बाबा सुट्टीच्या दिवशी नुसताच घरात लोळत पडणार असेल किंवा टी व्ही समोर बसून राहणार असेल तर कुटुंबीयांच्या दॄष्टीने तो अनुपस्थित असल्यासारखेच आहे. सुट्टीच्या दिवशी मित्रांबरोबर पार्ट्या करायला ज्या बाबाला वेळ असतो तो आपल्या छोटीला बागेत का घेऊन जाऊ शकत नाही? टी व्ही समोर दिवस घालवणारा बाबा किती वेळा मुलांबरोबर मूल होऊन खेळतो?

कामाचा व्याप आणि कमी पडणारा वेळ हे आपण स्वतच निर्माण केलेले राक्षस तर नाहीत हे सर्व नोकरदार आई-बाबांनी तपासून पहायची वेळ आली आहे. शेवटी ‘हाऊ फार इज टू फार’ हे ज्याचे त्यालाच ठरवावे लागणार आहे.

1 comment: