Thursday, October 14, 2010

उत्सव - दुसरी बाजू

काल रात्रीची घटना. वेळ रात्री १२ च्या आसपास. आम्ही सगळे दुसरी शिफ्ट संपवून घरी परत येत होतो. रेसकोर्स रस्त्यावर एक तोरण मिरवणुकीची सजावट केलेला ट्रॅक्टर चालला होता. सजावट रुंदीला बरीच मोठी असल्यामुळे जवळ जवळ सगळा रस्ता अडवला गेला होता. ट्रॅक्टर आपल्या गतीनी चालला आहे आणि त्याच्यामागे अनेक गाड्या हॉर्न वाजवत हळूहळू चालल्या आहेत असे दॄष्य होते.

आमच्या बसमधे लगेच चर्चा सुरु झाली की कसे हे उत्सव आणि ह्या मिरवणुका सामान्यांना त्रासदायक ठरतात वगैरे. सर्वांची चिडचिड चालू होती. उत्सव आणि त्याच्या सार्वजनिक स्वरूपाबद्दल आजवर बर्‍याच चर्चा झाल्या आहेत पण बर्‍याचदा त्या एकांगी असल्यासारख्या वाटतात कारण ह्या चर्चा फक्त उत्सवामुळे होणार्‍या गैरसोयींचा उहापोह करताना दिसतात. उत्सवाचे सामाजिक, आर्थिक, राजकीय फायदे कोणी लक्षातच घेत नाही.

सर्वप्रथम आर्थिक फायदे बघु. आपल्याकडे कुठलाही उत्सव हा व्यापाराची प्रचंड मोठी संधी असते. साध्या जयंत्या साजर्‍या करण्यासाठी देखिल काही हजार रुपायांची उलाढाल होते. तर गणपती नवरात्री सारख्या मोठ्या उत्सवांमधे ती कोटींच्या घरात पोचते. असंख्य लहान मोठ्या कुटीर उद्योगांना त्यामुळे चालना मिळते. अर्थव्यवस्था खेळती राहते आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते.

सामाजीक फायदे होणार्‍या गैरसोयींच्या मानाने जास्त महत्वाचे आहेत. पहिले म्हणजे नविन पिढीला आपल्या सणांची ओळख होते. उत्सव साजरे करण्यासाठी जी मंडळे, ग्रुप, ट्रस्ट बनवले जातात त्यातुन समाजातील विविध स्तरातील लोक एका मंचावर एकत्र येतात आणि सहाजीकच ऐक्याची भावना वाढते. इतर धर्माचे उत्सव साजरे करताना आपोआप धार्मिक सौदार्ह्य वाढते. वर्गणी जमवणे, मांडव घालणे, पालिकेची परवानगी काढणे, ध्वनी व्यवस्था, विविध कार्यक्रमांची व्यवस्था, जाहीरातबाजी अशा अनेक संघटनात्मक कामांमधुन कार्यकर्त्यांना परस्पर समन्वय आणि व्यवस्थापनेचे धडे मिळतात. याच कार्यकर्त्यांची नैसर्गिक आपत्ती, अपघात इ. वेळी फार मदत होते. आत्ता परवा जी ढगफुटी झाली त्यावेळी अनेक मंडळांचे कार्यकर्ते लोकांच्या मदतीला धाऊन गेल्याचे आपण पाहिले. आमच्या बसमधे त्यांच्या नावानी लाखोल्या वाहणार्‍यांपैकी किती जण त्यावेळी भर पावसात अशी मदत करत होते?

राजकीय फायदा हा तर टिळकांचा उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्यामागचा मूळ उद्देश होता. उत्सवाच्या माध्यमातून आपली राजकीय विचारधारा लोकांसमोर मांडता येते. आजकाल तर उत्सव मंडळ हे राजकीय कारकीर्दीची बालवाडी मानली जाते. ह्या फ्लेक्सवर झळकणार्या चेहर्‍यांमधेच आगामी काळातील आमदार, खासदार दडलेले असतात.

त्यामुळे मला वाटते की फक्त उत्सवांच्या नावाने खडे फोडून काही साध्य होणार नाही तर त्याची दुसरी बाजू पण तपासून पहायला हवी. माझ्या दॄष्टीने ह्या सर्व गैरसोयी ही भारत नामक एका अतीव सुंदर देशात राहण्यासाठी मोजलेली छोटीशी किंमत आहे.

No comments:

Post a Comment