Friday, January 13, 2012

चोळणं म्हणजे काय रे भाऊ ?

आज पर्थच्या मैदानावर ऑस्ट्रेलियानी भारतीय क्रिकेट संघाची जी काही वाट लावली त्याला शुद्ध मराठीमधे ‘चोळणे’ असे म्हणतात. अरे काय चाललय काय ? आपले दहा फलंदाज मरतमरत १६१ धावा करतात आणि त्यांचा एकटा वॉर्नरच १०४ धावा कुटतो तेही एकाच खेळपट्टीवर आणि एकाच दिवशी ? म्हणजे खेळपट्टीचे स्वरूप बदलले वगैरे म्हणण्याची पण सोय नाही.

लोकं येतात काय चार चेंडूंना हातातली फळी लावायचा प्रयत्न करतात काय आणि एकदाची फळी चेंडूला लागली की लगेच परत तंबूत जातात काय काहीच डोक्यात शिरत नव्हतं. बरं फलंदाज चुकले आता गोलंदाजांकडून काही अपेक्षा ठेवाव्यात तर त्यांची तर ‘न भूतो न भविष्यति’ अशी धुलाई केली वॉर्नर आणि कोवाननी.

ह्यापुढे भारतीय संघ परदेशी गेला की त्यांना प्रत्येक डावात दोनदा फलंदाजी दिली जाईल असा नियम आयसीसीने करून टाकायला हवा. नाहीतर ह्यापुढील सर्व कसोटी सामने फक्त भारतात होतील असे तरी जाहीर करावे. असे क्रांतीकारी निर्णय घेतल्याशिवाय भारतीय संघाला कसोटी जिंकणे शक्य होईल असे वाटत नाही. पवार साहेब आता जरा तुम्हीच यात जातीने लक्ष घाला.

No comments:

Post a Comment